श्री दत्तच्या वार्षिक सभेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजूरी

श्री दत्तच्या वार्षिक सभेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजूरी

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देणार मदतीचा हात : गणपतराव पाटील
साखरेची आधारभूत किंमत ४२ रुपये प्रति किलो करण्याची मागणी : रघुनाथ पाटील
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
महाराष्ट्र राज्यात महापुराने थैमान घातले आहे. ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे. या काळात पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दोन दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठावाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे. सभासदांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचे नाते जपण्याचे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी या वार्षिक सभेत बोलताना केले.
गेल्या सात वर्षात साखर उद्योगात उसाच्या एफआरपीमध्ये रुपये २७५० वरून ३५६० रुपयापर्यंत प्रतिटन वाढ झाली. मात्र साखरेची किमान आधारभूत किंमत फेब्रुवारी २०१९ पासून प्रतिक्विंटल ३१०० रुपये इतकीच आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे साखर उद्योगाकडून साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. साखर उत्पादन, खप व दरामुळे साखर कारखानदारीचे आर्थिक चक्र सातत्याने अडचणीत येत आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचा मोबदला वेळेत देता यावा. या उद्देशाने केंद्र शासनाने साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे साखरेची आधारभूत किंमत किमान ४२ रुपये प्रति किलो करावी अशी मागणी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी वार्षिक सभेत बोलताना केली.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५६ वी आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चारिटेबल ट्रस्टची १८ वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी या वार्षिक सभेत सहकार महर्षी गणपतराव पाटील आणि कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
सभेच्या सुरुवातीस कारखान्याचे संस्थापक माजी खासदार दत्ताजीराव कदम, श्रीमंत विश्वासराव घोरपडे (सरकार), माजी आमदार दलित मित्र दिनकरराव यादव, माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल सालात दिवंगत झालेल्यांच्या नावांच्या यादीचे वाचन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केले. दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी कारखाना आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या विषय पत्रिकेचे वाचन केले सभासदांनी दोन्ही विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने हात उंचावून मंजूर केले.
या सभेत बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील पुढे म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांने नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगार बंधूंचे हित साधले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणेच ऊस उत्पादकांना एक रकमी एफआरपी दिली आहे. सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारी टिकविण्यातच शेतकऱ्यांचे हित आहे. यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी आपण पिकवलेला ऊस गाळपास कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील राहील. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. दोन दिवसात या मदत केंद्रात मदत करावी. सदरची मदत कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना पोहोच केली जाईल असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील हे अध्यक्षीय मनोगतात बोलताना म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कामगारांच्या बरोबरच कारखान्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यामुळे कारखान्याच्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उद्योग यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. गत गाळप हंगामात साखर कारखान्याने १० लाख ७० हजार ७८२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले १२.१९% ऊसाची रिकवरी राहिली असून ११ लाख ६० हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन झाली. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे कारखान्याने ३२०० रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली आहे. केंद्र शासनाने यावर्षी १०.२५% साखर उताऱ्याकरता प्रति टन ३५५० रुपये ऊसाची एफआरपी व त्यापुढे १% टक्के साखर उताऱ्यास प्रतिटन ३४६ रुपये एफआरपी निश्चित केली आहे. ही बाब सर्व ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंददायी आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे त्यांनी शेवटी आवाहन केले.
या सभेस व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक , संचालक गणपतराव पाटील, अरुणकुमार देसाई, श्रीमती विनया घोरपडे ,अनिलकुमार यादव , बाबासो पाटील ,विश्वनाथ माने , शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ॲड प्रमोद पाटील , निजामसो पाटील , अमर यादव , दरगू माने – गावडे , ज्योतीकुमार पाटील , ,सिद्धगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संगीता पाटील -कोथळीकर , अस्मिता पाटील ,इंद्रजित पाटील, रणजित कदम , महेंद्र बागे, विजय सुर्यवंशी , कामगार प्रतिनिधी प्रदिप बनगे , कारखाना सचिव अशोक शिंदे , कायदेशीर सल्लागार ॲड शिवाजीराव चव्हाण, रणजित शिंदे , माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव , अरुणराव इंगवले, माजी सरपंच गजानन संकपाळ तसेच कारखाना सभासद कर्मचारी व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख , सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानून सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.


