अरुणाचल प्रदेशमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; ‘नीपको’ कॉलनीला पुराचा मोठा तडाखा, ४ जण अद्याप बेपत्ता

अरुणाचल प्रदेशमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; ‘नीपको’ कॉलनीला पुराचा मोठा तडाखा, ४ जण अद्याप बेपत्ता
इटानगर:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
अरुणाचल प्रदेशमधील केयी पान्योर जिल्ह्यातील याझाली परिसरातील पूसा येथे ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. येथील ‘नीपको’ (NEEPCO) प्रकल्पाच्या निवासी वसाहतीला या पुराचा प्रचंड तडाखा बसला असून, यामध्ये एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे, तर चार नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) तुकड्या युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूसा परिसरातील एका निर्माणाधीन सुरक्षा भिंतीचा भाग कोसळला. यामुळे डोंगरावरून आलेले पाणी आणि दरडीचा ढिगारा थेट सखल भागात असलेल्या नीपको कॉलनीमध्ये घुसला. या अचानक आलेल्या महापुरात वसाहतीमधील सुमारे १५ ते १८ निवासी घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. या दुर्घटनेत विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या ३५ वर्षीय शिक्षिका निर्मला गुप्ता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह शोध पथकाला सापडला आहे. मात्र, १३ वर्षीय एलिश मारक आणि ३० वर्षीय बालारी मारक यांच्यासह अन्य दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.
मुसळधार पावसामुळे केवळ वसाहतीचेच नुकसान झाले नसून संपूर्ण जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे. इटानगर-होज-याझाली राष्ट्रीय महामार्गावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक प्रवासी रस्त्यात अडकून पडले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ‘नीपको’ प्रशासनाने रंगा नदी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, प्रकल्पातील वीज निर्मिती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या नैसर्गिक आपत्तीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पूरग्रस्त भागात प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदत पोहोचवली जात असल्याचे सांगतानाच, त्यांनी पीडित कुटुंबीयांच्या आणि बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून स्थानिक माजी सैनिकांच्या मदतीने बचावकार्याचे संचलन करत आहेत.




